इस्तव
आंबेडकरी प्रेरणेच्या वाङमयविश्वात एक नवा कथासंग्रह अलिकडेच दाखल झालाय. ‘इस्तव’ हा सुनिल हेतकर यांचा पहिलाच कथासंग्रह हेतकर्स प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आला आहे. कथा, कादंबरी लेखनाकडे आंबेडकरवादी लेखक फारसे वळत नसल्याच्या काळात कवी असलेल्या सुनिल हेतकर यांनी कथेच्या प्रांतात आश्वासकरित्या पाऊल टाकलेले आहे. समकालीन समाजमनाच्या ठाव घेणारे आशयद्रव त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तीतून या कथामध्ये उतरले आहे.
‘इस्तव’ या संग्रहात सुनिल हेतकर यांच्या १० कथांचा समावेश आहे. डॉ. प्रकाश खरात यांची दीर्घ प्रस्तावना असलेल्या कथासंग्रहाला कवी डॉ. महेश केळुसकर यांचा ब्लर्ब आहे.
सुनिल हेतकर हे मराठी वाङमयविश्वात आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेवून कविता लेखन करणारे प्रतिथयश कवी म्हणून परिचित आहेत. टेळका( २००१) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांचे ‘थेरीगाथा-स्त्रीमुक्ती,समाज आणि तत्त्वज्ञान’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध-धम्मविषयक दृष्टीकोन व २२ प्रतिज्ञा’ आदी वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. आपल्या कवितेतून आंबेडकरी प्रेरणेच्या कवितेच्या आशयाचा पैस विस्तारणा-या सुनिल हेतकर यांची कथाही गद्य वाङमयात मोलाची भर टाकेल अशा दमदार कथांचा ‘इस्तव’ हा संग्रह आहे.
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुनिल हेतकर हे सध्या नवी मुंबई येथे कोकण रेल्वेमध्ये ज्युनि. इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
इस्तव
(कथासंग्रह )
सुनिल हेतकर
प्रकाशन- हेतकर्स पब्लिकेशन
पृष्ठे – १७३
किंमत – रु.३००